विदर्भात पावसाचे थैमान; पुरामुळं अडकले १०२ विद्यार्थी, रात्रभर शाळेतच मुक्काम

नागपूर जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका जिल्ह्यातील व्याहाड गावातील विद्यार्थ्यांना बुधवारी बसला. येथील परमानंद विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या एकूण १०२ विद्यार्थ्यांना शाळेतच अडकून पडावे लागले. गावाला लागून असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या विद्यार्थ्यांना गावाबाहेर काढता आले नाही.

नागपुरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. लहान-मोठ्या धरणांचे पाणी सोडल्यानेही नदी-नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत धोकादायक वाढ झाली आहे. नागपूर ते अमरावती मार्गावरील चौदाव्या मैलापासून दोन ते तीन किलोमीटर असलेल्या व्याहाड गावातून जाणाऱ्या नाल्याला पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. याच गावातील परमानंद विद्यालयात आजूबाजूच्या विविध गावांमधून विद्यार्थी येतात. यातील काही विद्यार्थी एसटीने जाणे-येणे करतात. पुलावरील पाण्यामुळे एसटी गावात येऊ न शकल्याने हे सर्व विद्यार्थी शाळेतच अडकले आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्याच्या दृष्टीने उशिरा रात्रीपर्यंत प्रयत्न सुरू होते. परमानंद विद्यालय ही माजी मंत्री सुनील केदार यांच्या संस्थेची शाळा असल्याची माहिती आहे. या शाळेशिवाय, येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंटचेही काही विद्यार्थी शाळेतच अडकले आहेत.

दररोज पाच वाजता शाळा सुटते; मात्र पुराचे पाणी वाढत असल्याचे बघून आम्ही मुलांना दुपारी वाजताच घरी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आम्ही बोलावलेली एसटी बस गावात येऊ शकली नाही. दुपारपासून मुलांना शाळेतच ठेवले आहे. विद्यार्थ्यांना गावाबाहेर काढणे शक्य न झाल्यास त्यांची व्यवस्था शाळेतच करण्यात आली आहे. शाळेला पुराच्या पाण्याच्या कोणताही धोका नाही. ग्रामस्थांनी मुलांकरिता गाद्यांची व्यवस्था केली आहे. शिवाय, मुलांना पोषण आहारातून जेवणही दिले आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक अरुण वडस्कर यांनी  बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *