कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर प्रथमच दहीहंडी उत्सव एकदम जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र, या उत्सवाला गालबोट लागले. अनेक ठिकाणी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघनही करण्यात आलेले दिसून आले. दहीहंडी फोडताना शुक्रवारी दिवसभरात मुंबईत 153 गोविंदा, तर ठाणे शहरात 37 गोविंदा जखमी झाले.
मुंबईतील 88 गोविंदांना उपचार करून घरी सोडलं. उर्वरित 23 जण रुग्णालयात दाखल आहेत. ठाण्यातील 29 जखमी गोविंदांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. तर आठ जणांवर उपचार सुरू आहेत.
मानवी मनोरे रचण्यासाठी 14 वर्षांखालील मुलांचाही सऱ्हार्स समावेश करण्यात आला. आवाजाच्या मर्यादेचेही उल्लंघन झाले. अनेक गोविंदा पथकांतील गोविंदा दुचाकीवर स्वार होऊन वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत होते.
मुंबईत ठिकठिकाणी दुचाकीस्वारांचा स्वैरसंचार होता. टेम्पो, ट्रकमधून नियमबाह्य पद्धतीने गोविंदांची वाहतूक करण्यात येत होते. गोविंदांचे ट्रक, टेम्पो, मोटारगाड्या आणि दुचाकींमुळे दहीहंडी उत्सवस्थळाच्या आसपासच्या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
