दहशतवादाचा ‘ओमान प्लॅन’?

रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी संशयास्पद बोटीत AK-47 आणि काडतुसं सापडल्यानं खळबळ उडालीय. ही बोट ओमानमार्गे आली होती. यानिमित्तानं दहशतवादाचा ओमान प्लॅन पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट.

कसाब आणि त्याच्या साथीदारांनी 13 वर्षांपूर्वी  मुंबईला लक्ष केलं होतं. मुंबईत येण्यासाठी या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रीमार्ग निवडला. कसाबसह 10 पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.

या हल्ल्यात 160 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटावेळी देखील रायगडमधील श्रीवर्धनच्या समुद्रकिना-यावर आरडीएक्स उतरवण्यात आले होते. रायगड किनाऱ्यावरील ही बोट ओमानमधून आलीय. यानिमित्तानं ओमानचा दहशतवादी मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

दिल्ली पोलीस आणि रॉनं काही महिन्यांपूर्वी ओसामा आणि झिशान या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यावेळी आपण ओमान मार्गे पाकिस्तानात दहशतवादाचं प्रशिक्षण घेतल्याची कबुली त्यांनी दिली.

भारतीय सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIकडून ओमान मार्गाचा वापर केला जातो. ओसामा आणि झिशान याच मार्गानं पाकिस्तानात गेले. तिथं त्यांना ISIनं प्रशिक्षण दिलं.

दहशतवादाचा हा नवा मार्ग भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. आधीच सीमेवर पाकिस्तान आणि चीन सातत्यानं कुरापती करतोय. त्यात ओमानचा सागरी मार्गही भारतासाठी सुरक्षित राहिलेला नाही हेच यातून स्पष्ट होतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *