पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार यासंदर्भातील निर्णय सोमवारी (आज) होणार आहे. सध्याच्या घडीला ईडी कोठडीत असणाऱ्या राऊतांना 4 ऑगस्टरोजी त्यांची कोठडी संपली असता न्यायालयानं पुन्हा कोठडी वाढवण्याचा निर्णय सुनावला.
परिणामी राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम 8 ऑगस्टपर्यंत वाढला. आज त्यांच्या कोठडीचा अखेरचा दिवस असल्यामुळं आता त्यांना सदर प्रकरणातून सुटका मिळणार की त्यांची कोठडी आणखी वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांना 31 जुलै रोजी नऊहून अधिक तास चौकशी केल्यानंतर ईडीकडून अटक करण्यात आली होती. ज्यानंतर त्यांचा मुक्काम ईडी कोठडीतच असल्याचं पाहायला मिळत आहे.
राऊत यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले होते. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. पत्राचाळ प्रकरण, अलिबागमधील जमिनीचे व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावे झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता.
