लिंगबदल शस्त्रक्रियेत पुरुषांची संख्या अधिक, दहा वर्षांत ४० पुरुषांनी स्वीकारले स्त्रीत्व

प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय इच्छुकांपुढे खुला झाला आहे. यात शस्त्रक्रिया करून स्त्री होण्याची असोशी असलेल्या पुरुषांची संख्या अधिक आहे. जनुकीय बदल, दोष तसेच स्त्री वा पुरुष असल्याची शरीराची हाक, अशा विविध कारणांसाठी या शस्त्रक्रिया केल्या जातात. मागील दहा वर्षांमध्ये अशा किती शस्त्रक्रिया पालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये करण्यात आल्या, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती मागवली होती. त्यानुसार लिंगपरिवर्तन केलेल्या पुरुषांची संख्या अधिक दिसून येते.

पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये दहा वर्षांत ४० पुरुषांनी लिंगबदल करून स्त्रीत्वाचा स्वीकार केला. तर १६ महिलांनी पुरुष होण्याचा पर्याय स्वीकारला. परळ येथील केईएम रुग्णालयामध्ये अशा जेनेटिक दोषासाठी सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर जे. जे. रुग्णालयामध्ये दहा पुरुषांच्या आणि पाच महिलांच्या लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पुरुषांमध्ये लिंगबदल करणे वैद्यकीय तज्ज्ञांना सोपे वाटते. मात्र महिलेला पुरुष बनवण्यासाठी असणारे वैद्यकीय आव्हान अधिक गुंतागुंतीचे आहे, असे प्लास्टिक सर्जन डॉ. एम. एस. मोरे यांनी सांगितले. महिलांमध्ये लिंगबदल करताना गर्भाशय काढले जाते. दोन ते तीन टप्प्यांत शस्त्रक्रिया करण्यात येतात. नव्या अवयवांचे रोपण करण्यात येते. पुरुषांप्रमाणे शरीरावर केस असावेत, यासाठी संप्रेरकेही शरीरामध्ये सोडली जातात. पुरुषांमध्ये कृत्रिम स्तनरोपण करण्यात येते. मात्र गर्भाशय नसल्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही.

वैद्यकीय स्पष्टता गरजेची

केवळ एखाद्याला स्त्री वा पुरुष व्हावेसे वाटते, म्हणून लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली जात नाही. त्यामागे वैद्यकीय, शारीरिक, मानसिक चाचण्यांसोबत या शस्त्रक्रियेनंतर सामाजिक पाठिंबा किती मिळेल, याचीही पूर्वकल्पना संबंधित व्यक्तीला दिली जाते. त्यानंतर या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिक तयारी आहे का, याची वैद्यकीय चाचणी केली जाते. लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियांमुळे मानवी शरीरामध्ये अनेक चढ-उतार येतात. एखाद्या व्यक्तीला लिंगबदल नेमका कोणत्या कारणासाठी करायचा आहे, याची वैद्यकीय सुस्पष्टता असावी लागते. नैसर्गिक स्त्री किंवा पुरुषांप्रमाणेच लिंगबदलानंतर शरीरात बदल होतील, अशी अवास्तव अपेक्षा बाळगून चालत नाही. त्यासाठी समुपदेशनाची गरज असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *