पार्सल द्यायला उशीर झाल्याने चायनीज विक्रेत्यावर हल्ला, उल्हासनगर हादरले

उल्हासनगरात एका किरकोळ कारणावरून गावगुंडांनी एका चायनीज विक्रेत्यावर हल्ला केला. पार्सल द्यायला उशीर झाल्यानं गावगुंडांनी चायनीज विक्रेत्यासह त्याच्या जावयावर जीवघेणा हल्ला चढवला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीनस चौकात घडलेल्या या घटनेमुळं उल्हासनगरात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय. तर या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या तिघांनाही सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्हीनस चौक परिसर येतो. या चौकात दर्शन राय यांचं मनोज कोळीवाडा हे चायनीजचं दुकान आहे. या दुकानात १२ जूनच्या रात्री सव्वाबारा वाजता ज्ञानेश्वर भोईर हा पार्सल घेण्यासाठी आला. मात्र तोवर दुकान बंद झालेलं असल्यानं राय यांनी त्याला १० मिनिटं थांबायला सांगितलं. मात्र १० मिनिटांत पार्सल न मिळाल्यानं त्यानं दर्शन राय यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी दुकानातील कारागिरांनी त्याला प्रत्युत्तर देत हुसकावून लावलं.

काही वेळाने ज्ञानेश्वर भोईर हा त्याच्यासोबत कुख्यात गुंड शैलेश भोईर याच्यासह सुशील भोईर, अशोक कोळी आणि अन्य ४-५ जणांना घेऊन आला आणि त्यांनी थेट दर्शन राय यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडत, रॉडने मारहाण करण्यात आली. तसंच त्यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी आलेला त्यांचा जावई रुपेश राय याच्याही डोक्यात बिअरची बाटली फोडून सिलिंडर आणि रॉडने मारहाण करण्यात आली. या घटनेत रुपेश याच्या डोक्यात दुखापत होऊन त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. हाणामारीची ही घटना दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली. या घटनेनंतर कारागिरांनी या दोघांना उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. तर या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या तिघांनाही सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, व्हीनस चौक हा उल्हासनगर शहरातला अतिशय गजबजलेला चौक म्हणून ओळखला जातो. या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली असून पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं आव्हान निर्माण झालंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *