राज्यात कोरोनाची संख्या वाढत असल्याने 13 जूनपासून शाळा सुरु होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत असताना योग्य काळजी घेऊन नियोजनानुसारच शाळा सुरु करण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘झी 24 तास’ला सांगितले.
राज्यात 13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढत अशल्याने त्याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. शाळा बंद राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पालक वर्गातूनही धास्ती व्यक्त होत होती. त्यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांबाबतचा संभ्रम दूर केला आहे. राज्यातील शाळा या 13 जूनपासून सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरर शाळा बंद करणं चुकीचे असल्याचं सांगत योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरु केल्या जातील, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे ठरल्याप्रमाणे राज्यात 13 जूनपासून शाळा सुरु होणार आहे. शाळेत पुन्हा आता किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. शाळेची घंटा वाजणार असल्याने मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार आहे.
