कोरोनाचा जोर ओसरलं असं वाटत असतानाच पुन्हा एकाएकी दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ झाली. मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसतेय. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अलर्ट झालीयं. महापालिकेने कोरोनाला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
याआधी आपण सर्वांना कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय सरकारला इच्छा नसताना घ्यावा लागला. मात्र आता पुन्हा कोरोनाला आपल्यावर वरचढ होऊ देता कामा नये, यासाठी पालिका प्रशासनाने काही निर्णय घेतेलत.
पालिकेने घेतलेले निर्णय
मुंबईतील कोरोना टेस्टची संख्या वाढवण्यात येणार आहे. कोरोना रोखण्यासाठी 12 ते 18 या वयोगटातील लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुस्टर डोसची संख्या वाढवावी, असेही निर्देश पालिकेने दिले आहेत.
जेणेकरुन भविष्यात जर कोरोना वाढला, तर रुग्णांची गैरसोय होणार नाही.
वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय
पालिकेच्या निर्देशानुसार, वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय होणार आहेत. वॉर रुमच्या माध्यमातून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच मदतीसाठी मुंबईतील प्रत्येक प्रभाग कार्यालयात वॉर रुम तयार करण्यात आले होते. वॉर रुममधून आपल्या हद्दीतील कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत याची माहिती ठेवली जाते.
पालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. खासगी रुग्णालयाने कोरोना काळात या विषाणूला रोखण्यासाठी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे आवश्यक ते आदेश महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिले आहेत.
मास्क सक्ती होणार?
कोरोना विषाणूचा ओसरता जोर पाहून राज्य सरकारने गुढीपाडव्याआधी सर्व निर्बंध शिथील केलं. यामध्ये कानावरचा मास्कही हटवण्यात आला होता. मास्कबाबतचा निर्णय हा ऐच्छिक ठेवण्यात आला होता.
राज्यात कोरोना रूग्णांची सध्या मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक संख्या आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. राज्यात 3500 अॅक्टिव केसेस आहेत. त्यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबईत आहेत असं त्यांनी म्हटलंय. ओमायक्रॉनच्या दोन नव्या व्हेरियंटचे सातही रूग्ण बरे होऊन घरी गेले असं टोपे म्हणाले.
