कल्याण -डोंबिवलीत अनेक भागात साडेतीन तास बत्तीगुल, उकाड्याने नागरिक हैराण

कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्वेला बहुतांश भागात साडेतीन तासांनंतर अखेर लाईट आले. आज पहाटे 4 वाजल्यापासून लाईट गेले होते. महापारेषणच्या पाल ते पलावा या अतिउच्चदाब उपकेंद्राला जोडणा-या वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या बहुतांश भागात पहाटेपासूनच लाईट गेले होते. आता साडेतीन तासांनंतर लाईट आलेत. ऐन उन्हाळ्यात काही ना काही कारणामुळे सतत खंडीत होणा-या वीजपुरवठ्यामुळे कल्याण डोंबिवलीकर त्रस्त आहेत.

डोंबिवली आणि कल्याणच्या अनेक ठिकाणी पहाटेपासून विजेचा लपंडाव सुरु होता.  त्यामुळेच उकाड्याने हैराण झालेल्या रहिवाश्यांनी महावितरणाच्या कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार पाल येथील वीज केंद्रामध्ये बिघाड झाल्याने विजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.  मात्र यासंदर्भात महावितरणाकडून अद्याप कोणतीही माहिती रहिवाशांना देण्यात न आल्याने नागरिक संतप्त झाले होते.

कल्याण – डोंबिवलीमधील काही भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला. ऐन साखर झोपेच्या वेळी वीज गेल्याने आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. काही लोक रस्त्यावर आले होते. तर अनेक अनेक जण इमारतीखाली जमा झाले होते.  बाजीप्रभू चौकामधील महावितरणाच्या कार्यालयासमोर रहिवाशांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. रहिवाशी संतप्त झाल्याने बाजीप्रभू चौकामधील महावितरणाच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *