राज्यात उष्णतेची लाट आहे. चंद्रपुरात पारा 43 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, आणखी चार दिवस तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
आजपासून चार दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांवर गेला आहे. हे तापमान असंच शनिवारपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
दरवर्षी मार्च महिन्यात उन्हाचे चटके बसू लागतात, तर कमाल तापमानाचा पारा एप्रिलमध्ये चाळीशी गाठतो. मात्र, यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडयातच राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला आहे.
या तुलनेत मुंबईत तापमान कमी असले तरी उकाड्याने नागरिक हैराण झालेत. त्यामुळे महत्वाचं काम नसेल तर दुपारी घराबाहेर पडू नका. लहान मुलं, वयोवृद्धांची काळजी घ्या. ज्यूस, थंडपेय प्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभाग आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
