गरिबाच्या पालावर काळाचा घाला! ऊसतोडणी मजुरांची मुलं कपडे धुवायला ओढ्यावर गेली आणि…

कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊस तोडणी मजुराच्या तीन बालकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे घडली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेली घटना रात्री आठ वाजता आईवडील फडातून पालावर आल्यावर उघडकीस आली.

आष्टी येथील व्यवहारे वस्तीवर लोकनेते बाबुराव पाटील अनगरकर अॅग्रो इंडस्ट्रीज साखर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांची पालं पडली आहेत. त्यात परभणी जिल्ह्यातील बोरवंड येथील गायकवाड आणि जाधव परिवारातील सदस्य ऊस तोडणी कामगार म्हणून कामाला आले आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे ऊस तोडणी मजूर मुलांना कोप्यांवर ठेवून फडावर गेले. त्यानंतर पालावरील रेणुका अंकुश जाधव (वय १७ ), चुलत भाऊ अजय बाळू जाधव (वय ५) आणि सुरेखा हिरामत गायकवाड असे तिघे ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेले अन ओढ्याच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, पण याची कुणालाच कल्पना नव्हती. रात्री आठ वाजता आईवडील पालावर आल्यावर त्यांनी मुलांची शोधाशोध सुरू केली. तेव्हा ओढ्यावर त्यांच्या चपला आणि धुण्याची बादली पाहून काही तरी अनर्थ घडला असावा, असा अंदाज त्यांना आला. त्यानुसार पाण्यात शोध घेतला असता रात्री दोन्ही मुलींचे मृतदेह मिळाले तर मुलाचा शनिवारी सकाळी १० वाजता मृतदेह सापडला. या प्रकरणी मोहोळ पोलिसांत अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *