कल्याणच्या गौरीपाडा तलावातील ८० कासवांच्या मृत्यूचं गूढ उकललं

काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये असणाऱ्या गौरीपाडा तलावातील अनेक कासवांचा अचानकपणे मृत्यू झाला होता. तब्बल ८० कासवं मृत्यूमुखी पडल्याने नक्की काय घडलं हा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर या कारणाचा उलगडा झाला आहे. वनविभागाकडून मृत कासवांची तपासणी करण्यात आली. व्हिसेरा तपासणीत या कासवांचा मृत्यू त्यांच्या पोटात घातक बॅक्टेरिया गेल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत वनविभागाचे कल्याण वनसंरक्षक आर एन चन्ने यांना अहवाल प्राप्त झाला असून याबाबत केडीएमसी ला पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आता तलावातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पावले उचलली जाणार आहेत.

कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा येथे मोठा तलाव आहे. याच तलावाचे काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले होते. या तलावात स्थानिक लोक मासेमारीही करतात. गौरीपाडा तलावात २२ जानेवारी रोजी काही कासवं मृतावस्थेत आढळली होती. काही कासवं तलावाच्या बाजूला असलेल्या गवतात आढळून आली होती. तलावात मासेमारी करताना माशांना काही खायला टाकण्यात आले असावे. तेच खाद्य कासवांनीही खाल्ले असावे किंवा तलावातील प्रदूषित पाण्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यताही वर्तविली जात होती. प्राणीमित्र संघटना व वन विभागाने तत्काळ धाव घेत मृत कासवाचे मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेतले. या कासवांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आला होता यानंतर कासव कशामुळे दगावले त्याच्या कारणांची प्रतीक्षा सुरू होती.

अखेर या व्हिसेरा तपासणीचा अहवाल वन विभागाकडे प्राप्त झाला असून या अहवालात कासवांचा मृत्यू घातक विषाणू पोटात गेल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान नोंदवण्यात आले आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने या पाण्यात कोणताही घातक पदार्थ नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. कासवाच्या संवर्धनासाठी सरंक्षणासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत केडीएमसी आणि वनविभागाला सूचना करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *