राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात आलेत…विधानभवन परिसरातील मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं…मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला…
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार आहे. विरोधकांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं. नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात आली. नवाब मलिक, दाऊदचे पोस्टर घेऊन विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी केली.
विधिमंडळाच्या बाहेर भाजप आमदारांनी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमकपणे घोषणा दिल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी कथित संबधांमुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने जोरदार घोषणा दिल्या.
राज्यसरकारनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजाराचं आणि कोरोनाचं निमित्त पुढं करून दरवर्षी नागपूरला होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतलं. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येईल असं सांगून बोळवण केली होती.
