मुंबईतील शाळा आता या तारखेपासून पूर्णवेळ भरणार

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. आता मुंबईतील शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.  पहिली ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ भरणार असल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये मास्कच वापरणे बंधनकारक असणार आहे. शाळेत खेळही सुरु राहतील, आदित्य म्हणाले.

मुंबईतील कोरोनाचा प्रभाव  कमी झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पूर्णवेळ शाळा सुरु करण्याचा घेतला आहे. विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा व मैदानी खेळ, विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक मुंबई महापालिकेने काढले आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी मुंबईत पुन्हा एकदा शाळा गजबजणार आहेत.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. तसेच ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढू लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध घातले होते. 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहतील, असे स्पष्ट केले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वेगाने ओसरू लागल्यानंतर  24 जानेवारीपासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या.

दरम्यान, शाळा सुरु करण्यात आल्यानंतर पालकांकडून संमतिपत्र घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. तसेच जे पालक आपल्या पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवत नाहीत त्यांच्याकरीता ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरू ठेवल्या जात आहेत. मात्र मुंबईतील कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे ओसरत असल्यामुळे शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये कोरोनाचा संसर्ग देशभरात सुरू झाल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *