करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरुन नाराजी आणि विरोध होत आहे. विद्यार्थी पालकांसह शिक्षकांनीही सरसकट शाळा बंद विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्या, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासंबंधी सरकार निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मधील काळात शिक्षणतज्ज्ञ किंवा पालक संघटनांशी चर्चा झाली त्यावेळी आम्हाला पत्रं, निवदेनं प्राप्त झाली. शाळा सुरु झाल्या पाहिजे असं अनेकांचं म्हणणं होतं. पण मधील काळात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने सरकारने शाळा, महाविद्यायलं सुरु करु नयेत असा निर्णय घेतला होता”.
प्रस्तावात काय आहे?
“शहर आणि ग्रामीण भागातील पहिली ते १२ वी अशा सर्व शाळांचा उल्लेख प्रस्तावात आहे. तसंच प्री प्रायमरी शिक्षण यांचाही विचार केला आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. करोनाच्या सर्व नियमांचं पालन करुनच शाळा सुरु करायच्या आहेत. त्यांना सर्व नियोजन करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण गेलं पाहिजे हेच मुख्य लक्ष्य आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा याकडे लक्ष दिवं जावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
