कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढल्याने राज्यात नव्याने निर्बंध लावण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट आली तरी तिचा धोका कमी दिसून येत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शाळा बंद कराव्या लागल्यात. आता पुन्हा शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे. राज्यात पुन्हा शाळा सुरु करायच्या की नाहीत, याबाबत उद्या मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
मंत्री राजेश टोपे यांनी Vaccine On Wheels याचे उदघाटन केले. त्यानंतर त्यांनी शाळाबाबत माहिती दिली. दुचाकीवरून पुण्यात ठिकठिकाणी जाऊन कोरोनाची लस दिली जात आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे, याची व्याप्ती वाढावी, असे ते म्हणाले. लस देण्याची गती वाढवायची आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे, रुग्णसंख्या स्थिर होत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मृत्यू होत नाहीत, ऑक्सिजन लागत नाही, व्हेंटिलेटरवर लागत नाहीत, परिस्थिती नियंत्रणात आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
कोरोना काळात सर्वांनीच लस घेतली पाहिजे. कोरोना टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत. टेस्टचा अहवाल व्यवस्थित मिळाले तर रुग्णांची माहिती उपलब्ध होऊ शकेल आणि त्यावर योग्य ते उपाययोजना करणे सोपं होईल. शाळा सुरु करण्याबाबत कॅबिनेटमध्ये उद्या चर्चा होईल, पालक, संस्था चालक, टास्क फोर्स, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन उद्या निर्णय घेतला जाईल, असे मंत्री राजेश टोपे म्हणाले.
नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत, स्थानिक पातळीवरील हा विषय असतो, राज्य स्तरावरचा त्याला संबंध।नसतो, बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढलो नाही, वैयक्तिक लढलो आहोत, त्यामुळे चांगले निकाल यावेत अशी अपेक्षा आहे, असे राजेश टोपे यांनी राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिली.
