पाण्यासाठी जीवघेणी कसरत; खोल दरी ओलांडून आणावं लागतं पाणी

हंडाभर पाण्यासाठी आजही आदिवासी भागातील महिलांना जीवघेणी कसरत करावी लागते. खरशेत (ता. त्र्यंबकेश्‍वर) ग्रामपंचायतीच्या परिसरात बारा पाडे असून, गावातील अनेक कुटुंब शेतीसाठी पाड्यापासून दीड किलोमीटरवरील तास नदीच्या काठी वास्तव्यास आहेत. पंचवीस वस्त्यांमधील आदिवासींची संख्या तीनशेहून अधिक असून इथल्या महिलांना रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर टाकण्यात आलेल्या बल्ल्यांवरून चालत जाण्याची, डोंबारींपेक्षाही भयानक कसरत दररोज करावी लागते.सरकारी अनेक योजना गावात येतात; परंतु वस्तीपर्यंत पोचत नाहीत, ही येथील आदिवासींची व्यथा आहे. वस्तीपासून नदीजवळ आहे; पण पाणी शुद्ध नसल्याने झऱ्यांमधून महिलांना पाणी आणावे लागते. झरे नदीच्या पलीकडे असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत येथील महिलांना करावी लागत आहे. हरसूलकडून येणारी तास नदी येथून वाहते. या नदीच्या दोन्ही बाजूला काळे पाषाण असून, तीस फूट खोल आहे. नदीचे पात्रदेखील वीस- पंचवीस फूट खोल आहे. नदीपलीकडे जाण्यासाठी महिलांची कसरत असते. दररोज जगणे-मरण्याचा संघर्ष महिलांना पाण्याच्या निमित्ताने करावा लागत आहे. बल्लीवरून पाय सरकल्यास थेट खोल नदीत पडण्याची शक्यता असते. अनेक ग्रामस्थ नदीत कोसळलेही आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *