मंदिर परिसरात तरुण-तरुणीने केली आत्महत्या; सुसाईड नोटमधून कारण उघडकीस!

‘आपण एकत्र जगू शकत नाही, पण मरू शकतो’ अशी चिठ्ठी लिहून ठेवत अहमदनगर जिल्ह्यातील प्रेमीयुगलांनी कोल्हापुरात आत्महत्या केली आहे. कुटुंबातील लोकांनी प्रेम विवाहाला विरोध केल्याने या दोघांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील एका यात्री निवासमध्ये गळफास लावून घेत तरुण-तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली.

राहुल विश्वासराव मच्छे (वय २५) आणि प्रियांका विकास भराडे (२२) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांत करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील हे प्रेमीयुगल होते. ते दोघेही एसटीने ३१ डिसेंबर रोजी कोल्हापुरात आले आणि अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या एका यात्री निवासात उतरले होते. आपण देवदर्शनसाठी आल्याचं त्यांनी व्यवस्थापकास सांगितलं. दोन दिवसानंतरही ते बाहेरच न आल्याने व्यवस्थापकास शंका आली. त्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह त्यांचे सहकारी तेथे आले. त्यांनाही दरवाजा ठोठावला. पण प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा प्रेमीयुगलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, पोलिसांना त्या रूममध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये ‘आम्ही दोघं बऱ्याच वर्षापासून प्रेम करतो. आमचं प्रेम कोणाला कळलंच नाही. या जन्मात एकत्र राहू शकत नाही, पण एकत्र मरू शकतो’ असं लिहिण्यात आलं होतं. त्यांच्या ओळखपत्रावरून नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. मृत प्रियांका भराडे हिचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहापूर्वीपासूनच दोघांचे प्रेमसंबंध होते. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *