राज्यात मुंबईसह ‘या’ ठिकाणी पाऊस, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने वर्तविला असताना अनेक जिल्ह्यात पाऊस झाला आहे .मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने हा पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले आहे.

येत्या 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने  व्यक्त केली आहे. रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात कमाल तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आहे.

मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत आहे. सायन, कुर्ला, वांद्रे परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तर पुणे शहर उपनगरात काही ठिकाणी पहाटेपासून पावसाच्या सरी पहाटेपासून रिमझिम पाऊस आहे.

नवी मुंबईमधील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. रिमझीम पावसाला सुरवात झाली असून रस्ते ओले झाले आहेत. तर कल्याण – डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. रिपरिप पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा आहे.

वसईत सुद्धा सकाळपासून पाऊस आहे. तर पालघरमध्ये ढगाळ वातावरण आहे. तसेच ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सकाळी शाळा आणि कॉलेज तसेच कामावर जाणाऱ्यांची तारांबळ उडाली होती. तर रायगड जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची रिमझिम दिसून येत आहे.

नाशिकमध्ये अवकाळी पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे द्राक्षबागांना फटका बसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यात अवकाळी पावसाची रिपरिप सुरू आहे. सकाळपासून सातारा जिल्ह्यातील अनेक भागात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *