एटीएम कार्ड बदलून फसवणूक

एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करत हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांच्या बँक खात्यातील पैशावर डल्ला मारत फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना ठाणे पोलिसांनी अटक केले आहे. या भामट्यांनी अशाप्रकारे राज्यात ५० ते ६० जणांची फसवणूक केली असून त्यांच्याकडून ३१ एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. ही एटीएम कार्ड वेगवेगळ्या नागरिकांच्या नावाने असून न्यायालयाने आरोपींना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.

 मानपाडा येथील अभय ओतारी ३१ मार्च रोजी मित्रासह हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी जेवणाचे बिल देण्यासाठी हॉटेलमधील वेटरला एटीएम कार्ड देऊन तसेच पिन क्रमांक सांगत एटीएम सेंटरमधून पैसे काढून आणण्याविषयी सांगितले. वेटर हॉटेल जवळील एटीएम सेंटरमध्ये गेला. मात्र पैसे निघाले नाहीत. वेटर पुन्हा हॉटेलमध्ये आला आणि ओतारी यांना एटीएम कार्ड परत केले. मात्र काही वेळानंतर बँक खात्यामधून १९ हजार रुपये काढल्याचा ओतारी यांना मेसेज आल्याने त्यांनी वेटरवर संशय घेऊन कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर वेगळाच प्रकार समोर आला. भामट्यांनी हातचलाखीने वेटरकडील ओतारी यांचे एटीएम कार्ड घेऊन वेटरला दुसरेच एटीएम कार्ड दिले. नंतर भामट्यांनी ओतारी यांच्या बँक खात्यातून पैसे काढले होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे, पोलिस निरीक्षक (प्रशासन) संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एन. पिंपळे यांच्या पथकाने माजिवडा परिसरातून सूरज ठाकूर आणि सागर अंभोरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विविध नागरिकांच्या नावाने तसेच बँकांची ३१ एटीएम कार्ड मिळाली. या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे आरोपी एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा करायचे आणि बोलण्यात गुंतवून तसेच पिन नंबर प्राप्त करत हातचलाखीने नागरिकांकडील एटीएम कार्ड घेऊन दुसरेच एटीएम कार्ड देत. त्यानंतर एटीएम कार्डच्या माध्यमातून पैसे काढून नागरिकांची फसवणूक करत असल्याची बाब समोर आली. आरोपींनी अशाप्रकारे ठाण्यासह मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि राज्यातील अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे.

ठाकूरवर तीन तर अंभोरेवर २० गुन्हे

 सुरज ठाकूर आणि सागर अंभोरे दोघेही सराईत आरोपी असून ठाकूर विरुद्ध वाशी पोलिस ठाण्यात २ तर कोनगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल आहे. तर अंभोरे विरुद्ध गंभीर गुन्ह्यासह फसवणूक आणि इतर असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. यामध्ये उल्हासनगर पोलिस ठाण्यात ७, तळेगाव दाभाडे १, कल्याण तालुका २, पेण १, खोपोली १, भोईवाडा १, रत्नागिरी १, श्रीनगर २, कांदिवली १, वर्तकनगर, सेंट्रल आणि वडखळ पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *