“१९९३ साली मुंबई वाचवल्याची फुशारकी मारणारे कुठल्या बिळात लपून बसले आहेत”; भाजपा आमदाराचा सवाल

त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. वाहने आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला. अमरावती, मालेगाव, नांदेड येथे बंददरम्यान समाजकंटकांनी दगडफेक आणि तोडफोड केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. नांदेड येथे पोलिसांनी प्लास्टिक गोळ्या झाडल्यानंतर हिंसक जमाव पांगला. दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा एकदा दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. भाजपाच्या नेत्यानी यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी राज्यातील अनेक शहरांत शुक्रवारी मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. या मोर्चाला नांदेड, मालेगाव, अमरावती आणि आणखी काही ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यात काही भागांत दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी मालेगावात दुकाने बंद करण्यासाठी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. यासर्व प्रकारावरुन भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी ठाकरे सरकारवर तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

“१९९३ साली मुंबई वाचवल्याची फुशारकी मारणारे राज्यात तालिबानी प्रवृत्ती माजल्या असताना कुठल्या बिळात लपून बसले आहे. या प्रवृत्ती नेमक्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात का डोकं वर काढतात???,” असा सवाल राम सातपुते यांनी केला आहे.

या घटनेवरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही चिंता व्यक्त केली आहे. “त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

दरम्यान, हिंसक वळण लागलेल्या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. ज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *