ऐरोली खाडी परिसरात मृत माशांचा खच

ऐरोली खाडीअंतर्गत येणाऱ्या गोठीवली गावालगत असलेल्या खाडीत मोठ्या प्रमाणात मासे मरण पावले आहेत. त्यामुळे मासेमारांचे मोठे नुकसान झाले आहे. खाडीतील गाळ काढण्याची परवानगी मिळत नसल्याने गाळात माशांना ऑक्सिजन मिळण्यास अडचण निर्माण होते. शिवाय, खाडीतील खारफुटीवर आलेल्या किडी मोठ्या प्रमाणात पाण्यात पडत आहेत. त्यामुशे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे हे मासे मृत झाल्याचा आरोप मासेमारांनी केला आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेत मासेमारांना सहकार्य करावे, अशी मागणी स्थानिक मासेमारांनी केली आहे.

नवी मुंबईला ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीकिनारी राहणारे लोक आजही येथील खाडीत मासेमारी करून उदरनिर्वाह चालवतात. काही लोक कालवा पद्धतीने, खाडीकिनारी माशांची शेती करून उत्पादन घेत असतात. मात्र ऐरोलीमधील गोठीवली गावानजीक असलेल्या खाडीकिनारी सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात खाडीतील मासे मृत झाल्याचे पाहायला मिळाले. मेलेल्या माशांचा खच या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे स्थानिक मासेमार हवालदिल झाले आहेत.

गोठीवली गावातील गुणानाथ म्हात्रे यांच्या खाडीतील मासे मृत झाले आहेत. यामध्ये बोईस, ढोमा, जिताडा, कोळंबी अशा प्रकारच्या माशांचा समावेश असून त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान काही केल्या भरून निघणार नाही, मात्र पुढे असे प्रकार टाळण्यासाठी खाडीतील गाळ काढण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी वन विभागाची परवानगी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. भरतीच्या वेळी पाण्याच्या प्रवाहासह खाडीतील कचरा वाहून येतो. शिवाय, खारफुटींचा कचरा यात अडकून बसतो. त्यामुळे पाण्यावर शैवाल जमते आणि खाली गाळ जमा होतो. त्यामुळे माशांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास अडचणी येतात आणि त्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याचे यावेळी मासेमार संघटनेचे शरद म्हात्रे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *