गाडीला कट मारल्याने वाद; मारहाणीत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चारचाकी गाडीला दुचाकीचा कट लागल्याच्या कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उरुळी कांचन परिसरात घडली. अक्षय अंकुश टिळेकर (वय. २३, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय टिळेकर हा दुचाकीवरून रस्त्याने निघाला होता. यावेळी त्याचा एका चार चाकी स्विफ्ट गाडीला धक्का लागला. त्यातूनच गाडीतील व्यक्ती व त्याची वादावादी झाली. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्याचवेळी स्विफ्ट गाडील तीन ते चार जणांनी अक्षय याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अक्षय बेशुद्ध पडला होता.

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. अक्षयला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर अक्षय याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *