मुद्रांक शुल्क एक हजार रुपये

मुद्रांक शुल्क एक हजार रुपये

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या बीडीडीवासीयांना कायमस्वरूपी घराची हमी देण्यासाठी सोडत काढण्याचा तसेच त्यानंतर करार पत्राचे वितरण करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण बीडीडीतील पुर्नवसित घरांसाठीच्या दस्तावर एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यासंबंधीचा अध्यादेश  जारी झाला आहे. मुंबई मंडळाकडून आता वरळीतील १६०, ना.म.जोशी मार्ग येथील ३८० आणि नायगावमधील १९० घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून त्यानंतर घरांची ऑनलाइन नोंदणी करुन देत करार पत्र वितरित केले जाणार आहे.

बीडीडीवासीयांच्या मागणीनुसार पुनर्वसित इमारती तयार होण्याआधीच कोणत्या रहिवाशाला नवीन इमारतीत कितव्या मजल्यावर कोणते घर मिळणार हे सोडतीद्वारे निश्चिात करत कायमस्वरूपी घराची हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यानंतर करारनामा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार ना.म. जोशी मार्ग २७२ घरांसाठी याआधीच सोडत काढली आहे. महत्त्वाचे म्हणजे बीडीडीतील पुनर्वसित इमारतीतील घरांसाठीच्या करारनाम्यावर, दस्तावर केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा अध्यादेश मागील काही दिवसांपासून रखडला होता. त्यामुळे ना.म.जोशी मार्ग येथील २७२ घरांसाठी सोडत निघूनही बरेच महिने उलटले तरी करार पत्र वितरण करणे मुंबई मंडळाला अशक्य होत होते. तर वरळी आणि नायगावमधील पात्र रहिवाशांना कायमस्वरूपी घराची हमी देण्यासाठी सोडत काढता येत नव्हती.

आता सोडत काढण्याचा आणि करार पत्र वितरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई मंडळाने वरळीतील १६०, ना.म.जोशी मार्ग येथील ३८० आणि नायगावमधील १९० घरांसाठी सोडत काढण्याच्या दृष्टीने सर्व तयारी याआधीच पूर्ण केल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *