राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर रेल्वे सेवाही बंद करण्यात आली. मुंबई लोकलसेवा अद्याप सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र, दोन डोस घेतलेल्यांसाठी रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी पास बंधनकारक करण्यात आला आहे. याचा फायदा रेल्वेला झाला आहे. मुंबईत दोन महिन्यांत 14 लाखांची रेल्वे पासची विक्री झाली आहे.
लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांना लोकल प्रवास खुला करण्यात आला आहे. जवळपास दोन महिने पूर्ण होत आले असून मध्य रेल्वेवर 11 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत 10 लाख 22 हजार 801 रेल्वे पास तर पश्चिम रेल्वेवर याच काळात 4 लाख 10 हजार 133 असे एकूण 14 लाख 32 हजार 934 रेल्वे पासची विक्री झाल्याची आकडेवारीवरुन दिसून येत आहे. तर उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱया रोजच्या प्रवाशांची संख्या 45 ते 48 लाखांच्या दरम्यान गेल्याचे म्हटले जात आहे.
एक दिवसीय प्रवासास परवानगी का नाही?
तर दुसरीकडे लसीकरण झालेल्यांना लोकलमधून प्रवासाची मुभा मिळाली असली तरी त्यासाठी रेल्वेचे तिकीट मिळत नाही. सिजन तिकीट काढावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना अद्यापही लोकलमधून प्रवास करता येत नाही. तर 18 वर्षांखालील लसीकरण सुरूच झालेले नाही. त्यामुळे लोकल प्रवास करता येत नाही.
सरकारने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या आणि लसीच्या दोन मात्रा झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा दिली. मात्र लासवंतांनकरिता मासिक सिझन तिकीट पास काढावा लागणार आहे. त्यामुळे रोज प्रवास न करणाऱ्या प्रवाशांना अजूनही लोकलची दारे बंद आहेत. दवाखान्यात किंवा अति महत्वाच्या कामासाठी जायचे असल्यास देखील तिकीट न मिळाल्याने लोकल प्रवास करता येत नाही. त्यामुळे सामान्य जनता नाराज आहे.
