पुन्हा आभाळ फाटलं! औरंगाबाद शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस; नदीला पूर

गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. औरंगाबाद शहरात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. शहरात पहाटे ढगफुटी सदृश्य पावसाने पुन्हा एकदा औरंगाबादला झोडपले आहे. त्यामुळं नदीला मोठा पूर आला असून गावांत पाणी शिरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादला मुसळधार पावसाने झोपडले आहे. मुसळधार पावसामुळं नदी- नाले दुधडी भरुन वाहत आहेत. तर, जायकवाडीसह अन्य धरणदेखील पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. तर, नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याना नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, शहरात आज पहाटे पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. पहाटे तीन- चारच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह शहरात मुसळधार पाऊस कोसळला. अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसाने संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत.

औरंगाबाद शहरात अर्ध्या तासात २५ मिनिटांत ५२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, कमी वेळेत पडलेल्या या पावसामुळं सुखना नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळं नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून गावांत शिरले आहे. तसंच, शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नूर कॉलनी येथे आणीबाणी सारखी परिस्थती निर्माण झाली होती. नाल्याला पूर आल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. घरांमध्ये चार – पाच फूट पाणी साचले होते त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.
दरम्यान, दसरा-दिवाळी सणासुदीच्या तोंडावर अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व उभ्या पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *