राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत काही दिवसांपूर्वी विधान केले होते. त्यातच आता राज्यातील मंदिरं ७ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडली जातील, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.
चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये. असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचं संकट कायम असल्याने मंदिर बंद ठेवण्यात आली होती. पण आता राज्य सरकारनं गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोना आटोक्यात आला आणि रुग्णांची संख्या कमी झाली की दसरा-दिवाळी दरम्यान राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली केली जाऊ शकतात, असा वक्तव्य काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं.
