फेरीवाल्यांचे पुन्हा बस्तान; कल्पिता पिंगळेंच्या हल्ल्यानंतर ‘ये रे माझ्या मागल्या’

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर भाजी विक्रेत्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर शहरातील फेरीवाल्यांविरुद्ध महापालिका प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली होती. महापालिकेने कारवाईचा धडाकाच लावल्याने अनेक रस्त्यांवरील फेरीवाले गायब झाले होते. हल्ल्याच्या घटनेला तीन आठवडे झाले असून आता पुन्हा शहरातील रस्त्यांवर फेरीवाले दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी पिंपळे यांच्यावर हल्ला झाला, त्या कासारवडवलीमध्ये हळूहळू फेरीवाल्यांनी रस्त्यावर बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे.

घोडबंदर भागातील कासारवडवली येथे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ठाणे महापालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत होती. कारवाई चालू असतानाच अमरजित यादव या भाजीविक्रेत्याने चाकूने माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे तसेच त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तर पालवे यांच्या हाताचे एक बोट तुटले होते. पोलिसांनी तात्काळ अमरजितविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली होती. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. रस्ते, पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यासह हातगाड्या, टपऱ्या तोडण्यात आल्या. शेडही काढून टाकण्यात आली. प्रत्येक प्रभागामध्ये महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरुद्धची मोहीम तीव्र केली होती. स्थानक रस्त्यावरही महापालिकेच्या पथकांनी धडक देत फेरीवाल्यांवर बडगा उगारला होता. या कारवाईमुळे फेरीवाल्यांचे धाबे दणाणले होते. कारवाईच्या भीतीने रस्त्यावर फेरीवाले दिसेनासे झाले. रविवार सुट्टीच्या दिवशीही महापालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. कारवाईचा चांगला परिणाम म्हणजे अनेक रस्ते फेरीवालेमुक्त झाल्याचे दिसत होते. कासारवडवलीमध्येही रस्त्यावर एकही फेरीवाला दिसत नव्हता. त्यामुळे येथील रस्ता फेरीवालामुक्त झाला होता. मात्र हल्ल्याच्या घटनेला तीन आठवडे झाले असून फेरीवाले पुन्हा एकदा रस्त्यावर हळूहळू अवतरू लागले आहेत.

वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी रांगेत हातगाड्या उभ्या केल्या जात असून फेरीवाल्यांना पालिकेच्या कारवाईचा कोणताही धाक वाटत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आणखी गंभीर बाब म्हणजे, पिंपळे यांच्यावर ज्या कासारवडवली भागात हल्ला झाला, तेथेही फेरीवाले पदपथ आणि रस्त्यावर बसून भाजी, फळांची विक्री करू लागले आहेत. विशेषकरून सकाळ आणि संध्याकाळी फेरीवाले दिसून येतात. याठिकाणी हळूहळू फेरीवाले वाढू लागले आहेत. वेळीच कारवाई न केल्यास पुन्हा कासारवडवलीसह शहरातील इतरही भागांत फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाल्याशिवाय राहणार नाही, असे काही जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *