शहरात संततधार पाऊस

शहरात संततधार पाऊस

औरंगाबाद शहरात तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. या वर्षी पावसात सातत्य असून, त्याचा भूजल पातळी वाढण्यास फायदा होणार आहे. शहरात मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर आणखी चार दिवस कायम राहणार आहे.

महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ग्रामीण भागासह शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होता. या संततधार पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास उपयोग होणार आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी असे चित्र कायम आहे. चिकलठाणा वेधशाळेत मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत २.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला. सलग दोन तास पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात सर्वदूर पाऊस झाला. काही वसाहतीत पावसाचे पाणी शिरले. विशेषत: सातारा, देवळाई, पडेगाव या नवीन वसाहतीत नागरिकांची रस्त्यावर चिखल झाल्यामुळे गैरसोय झाली. वसाहतींच्या अंतर्गत रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. रस्त्यांवरून वाहने चालवणे कठीण असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

या परिसरात तातडीने सिमेंटचे अंतर्गत रस्ते तयार करण्याची मागणी रखडलली आहे. या पावसाळ्यात नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. शहरालगतच्या सातारा आणि देवळाई भागात वन विभागाने तलाव खोदले आहेत. तसेच, डोंगररांगावर चर पाडले आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास या प्रयोगाचा पुरेसा फायदा झाला आहे. तलावात पाणीसाठा वाढला आहे. औरंगाबाद लेणी, सातारा डोंगर, जटवाडा डोंगरातील धबधबे वाहण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक पर्यटकांनी धबधबे पाहण्यासाठी गर्दी केली आहे. येत्या दहा सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पाऊस होईल, अशी माहिती एमजीएम विद्यापीठाच्या स्वयंचिलत हवामान केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *