गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने काल रात्रीपासून जळगाव जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये पाणी तुंबले असून गिरणा व तितूर नद्यांना पूर आला आहे. तितूर नदीला आलेल्या पुरामुळे कजगाव-नागद, खाजोळा-नेरी-नागद रस्ता बंद झाला आहे. या गावांचा रात्रीपासून संपर्क तुटला आहे. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदीसह उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. छोटे-मोठे बंधारे, पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे. सद्यस्थितीत जामदा बंधार्यावरून १ हजार ५०० क्यूसेक पाणी जात असून, दुपारनंतर त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. गिरणा नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात आज दुपारनंतर पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, तितूर नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शहरात पाणी घुसले. नदीकाठी असलेली घरे तसेच बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. बामोशी बाबा दर्गा परिसर, रोशननगर, जहांगीरदार वाडी, बाराभाई मोहल्ला, शिवाजीनगर, घाट रोड भाजीबाजार हा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत.
बोरीचे ५ दरवाजे उघडले
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे. पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बोरी धरणाची पाणी पातळी सद्यस्थितीत २६७.११ मी. इतकी आहे. आज सकाळी साडेसात वाजता धरणाचे ५ दरवाजे ०.१५ मीटरने उघडून २ हजार २५५ क्यूसेक विसर्ग नदी पात्रात सुरू आहे.
मन्याड धरण ओव्हरफ्लो
चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मन्याड नदीला जवळपास ५ हजार क्युसेक्सपर्यंत पाणी जात आहे. मन्याड व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जाऊ नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागासह जळगाव व उपविभागीय पाटबंधारे अभियंत्यांनी केले आहे.
