पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये राक्षे कुटुंब पिढीजात दुग्धव्यवसाय करत असून दिवसाला ५०० लिटर दूध विक्री करत आहे. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळतं. ज्या तरुणांना चार ते पाच एकर शेती आहे. अशा शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री, गायी, म्हशी सांभाळून आपला व्यवसाय सुरू करावा असं राक्षे कुटुंबातील प्रगतशील शेतकरी दिलीप राक्षे यांचा मोलाचा सल्ला आहे. दिलीप राक्षे हे मावळमधील साळुंबरे गावचे रहिवाशी आहेत. त्यांच्या कुटुंबात पहिल्यापासून दुग्धव्यवसायाला विशेष महत्व दिलं जात. एकीकडे मावळ हा इंद्रायनी भाताचे माहेर घर म्हटलं जातं. मात्र, असं असताना ही राक्षे कुटुंबाने दुग्धव्यवसाय करत उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण केला आहे. राक्षे यांच्याकडे एकून ८० म्हशी आहेत. त्यापैकी ५० म्हशी या दूध देतात. दररोज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही सत्रात ५०० लिटर दूध मिळते, असं राक्षे यांनी सांगितले आहे.
राक्षे यांचं बहुतांश दूध स्वीट होमला जातं, तिथं त्याची मिठाई बनवली जाते. दुधाला ५० लिटर रुपये भाव मिळतो. यातून त्यांना दिवसाला २५ हजार रुपये मिळतात. परंतु, कामगारांचा पगार, जनावरांचे खाद्य, ट्रॅव्हलिंग हे सगळा खर्च जाऊन पाच हजार निव्वळ नफा मिळतो अस राक्षे यांनी सांगितलं आहे. दूध व्यवसाय करत असताना मोठ्या प्रमाणावर मेहनत करण्याची तयारी असावी लागते, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
दरम्यान, दिलीप राक्षे यांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे. “ज्या व्यक्तींकडे चार-पाच एकर जमीन आहे. त्यांनी पोल्ट्री, गायी, म्हशी, असा जोडधंदा करावा. व्यवसायासह शेतीला सेंद्रिय खत मिळेल. त्यामुळं चार एकर जमिनीमधून सहा एकरचं उत्पन्न मिळेल. त्यामुळं तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतः मालक होऊन शेतीला प्राधान्य द्यावं.”, असं म्हटलं आहे.
