दिबांच्या नावासाठी प्रयत्न करणार: कपिल पाटील

दिबांच्या नावासाठी प्रयत्न करणार: कपिल पाटील

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, अशी येथील भूमिपुत्रांची मागणी आहे. त्यानुसार आपण स्वतःही विमानतळाला दि. बा पाटील यांचेच नाव मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. त्यांच्या सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेसमयी नवी मुंबईत आल्यावर ते बोलत होते. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्वच नेत्यांनी, भाजप कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक भूमिपुत्रांनीही गर्दी केली होती.

 ‘मागील कोणत्याही पंतप्रधानांनी जेवढी विकासकामे केली नसतील तेवढी विकासकामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून जनतेचा आशीर्वाद असल्यानेच ते मागील सात वर्षे पंतप्रधानपदी कायम आहेत आणि यापुढेही राहतील, असे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले. ही यात्रा संध्याकाळी उशिरा नवी मुंबई पालिका हद्दीत पोहोचली. बेलापूरमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी तर नेरूळमध्ये आमदार गणेश नाईक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांचे स्वागत केले. बेलापूरहून ही यात्रा ऐरोलीपर्यंत आली आणि तिथून पुढे गेली. जनतेच्या आशीर्वादातून काम करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगून मंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेली विकासकामे जनता आणि तरुणांपर्यंत पोहोचली आहेत. नवी मुंबईत भाजपची सत्ता आणण्यात गणेश नाईक समर्थ आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील जनतेशी बांधिलकी जपणारे नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न सुटतील, असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *