राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. असं असलं तरी करोना धोका काही टळलेला नाही. त्यामुळे सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
“अजूनही करोनाचं संकट टळलेलं नाही. ते आपल्याला टाळायचं आहे. आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, करोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर करोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल.”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोविड केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सूचना दिल्या आहेत.