केंद्र सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सुरु केलेल्या जनआशीर्वाद यात्रेला आता पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे. आत्तापर्यंत या यात्रेवर ३० हून अधिक गुन्हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. भाजपा नेत्यांनी काढलेल्या या यात्रेमध्ये करोना प्रतिबंधाचे नियमही धाब्यावर बसवल्याचं निदर्शनास आलं आहे.
भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये सात वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आत्तापर्यंत या यात्रेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३६ वर पोहोचली आहे.