शेती, फळबागा व इतर उपयुक्त वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी ठरणाऱ्या हुमनी कीटकांनी (भुंगेरे) आता जिल्ह्यातील कडुनिंबांच्या वृक्षांवरही हल्ला चढवला आहे. त्यामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणीचे कडुनिंबांचे वृक्ष वाळून जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाने जिल्ह्यातील या वेगळ्याच समस्येकडे लक्ष वेधले आहे. या समस्येच्या तपासणीसाठी संस्थेने जिल्हाव्यापी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात हुमनी कीटकांच्या भुंगेऱ्यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढल्याने त्याचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर कडुनिंब वृक्षांवर दिसून येत असल्याचे आढळले आहे.
निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाचे प्रमुख, निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांनी ही माहिती दिली. त्यांच्याच पुढाकारातून समूहामार्फत जिल्हाव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणात महापालिकेचे उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे यांच्यासह उमेश भारती, अतुल सातपुते, राजेंद्र बोकंद, संजय बोकंद, विजय परदेशी, अजिंक्य सुपेकर, विठ्ठल पवार, शशी त्रिभुवन, श्रीराम परंडकर, संदीप राठोड, अंकुश ससे, सतीश गुगळे, नितीन भोगे, मच्छिंद्र रासकर, प्रवीण साळुंके, विलास नांदे, अमित गायकवाड आदी ३० निरीक्षक या सर्वेक्षणात सहभागी झाले होते.