जालन्यात कापूस, मका पिकाचे क्षेत्र घटले

जालना जिल्ह्यात चालू खरीप हंगामात अगोदरच्या तीन वर्षांच्या तुलनेत कापूस आणि मका पिकांच्या क्षेत्रात घट झाली असून सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार चालू खरीप हंगामात जिल्ह्यात दोन लाख ६३ हजार ६१० हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. मागील (२०२०) खरीप हंगामाच्या तुलनेत (दोन लाख ८२ हजार ४५० हेक्टर) या वर्षी कापसाचे क्षेत्र ४४ हजार ६५८ हेक्टर एवढे कमी झाले आहे. चालू हंगामात कृषी विभागाने जिल्ह्यात प्रस्तावित केल्याच्या तुलनेत ९१ टक्के क्षेत्रच कापूस पिकाखाली आले आहे.

२०१८ मध्ये जिल्ह्यात तीन लाख दोन हजार ७२५ हेक्टरतर २०१९ मध्ये तीन लाख चार हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक होते. गेल्या चार वर्षांत चालू हंगामात प्रथमच कापसाचे क्षेत्र तीन लाख हेक्टरच्या खाली आले आहे.

अगोदरच्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी मका पिकाचे क्षेत्रही घटले आहे. चालू हंगामात (२०२१) जिल्ह्यात ३८ हजार ८४० हेक्टरवर मका आहे. कृषी विभागाने प्रस्तावित केल्याच्या तुलनेत हे प्रमाण ७० टक्के आहे. २०१८ मध्ये ४३ हजार, २०१९ मध्ये ५२ हजार आणि २०२० मध्ये ४२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मकाची पेरणी झाली होती.

चालू खरीप हंगामात कापूस आणि मका पिकांचे क्षेत्र घटले असले तरी सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. चालू खरीप हंगामात जिल्ह्यात एक लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अपेक्षेपेक्षा  हे क्षेत्र जवळपास ५० टक्के अधिक आहे. २०१८ मध्ये एक लाख ३६ हजार, २०१९ मध्ये एक लाख ३८ हजार आणि २०२० मध्ये एक लाख ४२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. गेल्या चार वर्षांत चालू खरिपात सोयाबीनची पेरणी अधिक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *