‘राज्याला ड्रायव्हर नको आहे, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवाय’ नारायण राणे यांची बोचरी टीका

मुसळधार पावसाने कोकणात थैमान घातलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड इथली परिस्थिती बिकट बनली आहे. संपूर्ण शहर पाण्यात बुडालं आहे. पुराच्या पाण्यात हजारो लाक अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, कोकणातील पूरस्थिती हातळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

राज्य सरकारला गांभीर्य नाही

राज्य सरकारला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही, कोकणात अतिवृष्टी झाली, लोकांचा जीव धोक्यात आला आहे, त्यांच्यासाठी तरतुद करुन ठेवायला हवी होती, याची माहिती नव्हती का? आजच पाऊस पडला का? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याना माणुसकी आहे का? अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. अतिशय गंभीर परिस्थिती आहे राज्यात विकास ठप्प आहे असं राणे यांनी म्हटलं आहे.

‘राज्याला ड्रायव्हर नको’

राज्याचे मुख्यमंत्री गाडी चालवत विठ्ठल दर्शनला गेले. पण चेंबूर आणि भांडूपला मृत पावलेल्या कुटुंबियांचं सांत्वन करायला गेले नाहीत. पंढरपुरला जाणं त्यांना महत्त्वाचं वाटतं, अस सांगत नारायण राणे यांनी ‘राज्याला ड्रायव्हर नको आहे, महाराष्ट्र शासनाकडे हजारो ड्रायव्हर आहेत, राज्याला लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवाय’ अशी बोचरी टीका केली. ‘कॅबिनेटला जायचं नाही, मंत्रालयात जायचं नाही आणि गाडी चालवत जायचं, यात कर्तृत्व कुठे आहे. आज जनतेचा जीव धोक्यात असताना, त्यांना वाचवायचं सोडून, ज्यांच्या घरातील माणसं गेली, त्यांचं सांत्वन करायचं सोडून हे गाडी चालवत गेले, असं नारायण राणे म्हणाले.

केंद्राकडून मदतीचं आश्वासन

कोकणात जवळपास 350 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. कोकणात जी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्याविषयी आपण केंद्राशी बोललो आहे, त्यांनी मदतीचं आश्वासन दिल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची माहिती राणे यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *