मुंबईचे महत्व कमी करण्याचा डाव सुरु असल्याचा आरोप याआधी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. आता त्यांचा हा आरोप सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलविल्याने राजकीय पक्षांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी ( Adani group) यांनी यांनी पहिल्यांदा कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. असे करुन मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राजकीय पक्षांनी करत आपला संताप व्यक्त केला आहे.
देशभरातील सहा विमानतळांचा ताबा अदानी यांच्याकडे
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचं मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. मुंबईचे हे विमानतळ आता पूर्णपणे ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या ताब्यात गेले आहे. त्याबरोबर एएएचएलचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले आहे. यामुळे मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या उद्योगात आणखी एक भर पडली आहे. देशभरातील सहा विमानतळांचे नूतनीकरण आणि त्याचा ताबा एएएचएलकडे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा संकटात आलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहाने स्वत:कडे घेतला आहे. तसेच नव्याने नवी मुंबई विमानतळाचा ताबाही एएचएलकडे गेला आहे. मुंबईचे विमानतळ खरेदी होईपर्यंत एएएचएलने मुंबईत मुख्यालय थाटले होते. पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन व्यवस्थापन पूर्ण होताच मुंबईतील गाशा गुंडाळत मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. त्यामुळे राजकीय पक्षातून नाराजी व्यक्त होत आहे.
तसेच आर. के. जैन यांच्याकडे एएएचएलच्या अखत्यारितील सर्व विमानतळांचे ‘सीईओ’ म्हणून कार्यभार सोपवला आहे. तर सध्याचे सीईओ बेन झॅन्डी यांच्याकडे एएएचएलअंतर्गत बिगर हवाई विभागाचे ‘सीईओ’ चा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर आता एएएचएलचे परिचालन अध्यक्ष ‘मिआल’चे सीईओ असतील. अदानी बंदरे आणि एसईझेडचे संचालक बीव्हीजेके शर्मा हे आता नवी मुंबई विमानतळाचे ‘सीईओ’ म्हणून काम पाहणार आहेत.
