दीड तोळ्यांच्या सोनसाखळीसाठी मुलाची हत्या

१४ वर्षांच्या मुलाच्या गळ्यातील दीड तोळ्याच्या सोन्याच्या साखळीसाठी त्याच्या मित्रांनीच त्याची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना कल्याणजवळ बापगाव परिसरात घडली आहे. घटनास्थळावरून मुलाचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पडघा पोलिसांनी काही तासातच अक्षय वाघमारे (२६) आणि १७ वर्षी अल्पवयीन आरोपीला बेड्या ठोकल्या. सोहम बजागे (१४) असे मृत मुलाचे नाव आहे.बापगावमधील साईराम सोसायटीत सोहम बजागे आपल्या आईवडिलांसमवेत राहत होता. सेन्चुरी कंपनीत काम करणाऱ्या सोहमच्या वडिलांनी मुलाच्या गळ्यात दीड तोळ्याची सोनसाखळी घातली होती. अक्षयची नजर या त्यावर होती. त्याने सोहमच्या मित्राच्या मदतीने त्याच्या गळ्यातील साखळी काढून घेण्यासाठी त्याच्या हत्येचा डाव रचला. बुधवारी संध्याकाळी ४च्या सुमारास सोहमला या मित्राने खेळायला चल सांगून जवळच्याच एका इमारतीमधील रिकाम्या फ्लॅट मध्ये नेले. तिथे त्या दोघांनी आधीच दोरी आणून ठेवली होती. अक्षयसह त्या मुलाने सोहमला घरात बंद करून त्याची दोरीने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह तिथेच टाकून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी घेऊन त्यांनी पळ काढला. बराच वेळ झाला तरी सोहम परत न आल्याने आईवडिलांनी शोधाशोध केली मात्र तो न सापडल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. परिसरात शोध घेत इतर खेळणाऱ्या मुलांनी दिलेल्या माहितीवरून माग काढत पोलिसांनी मृतदेह शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीना रात्री ११च्या सुमारास अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *