चारित्र्यावरील संशयाने संसार उद्ध्वस्त; पत्नीचा गळा दाबून खून, स्वतः घेतला गळफास

चारित्र्याच्या संशयाने पुण्यात एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दररोज भांडण करणाऱ्या पतीने सोमवारी (३१ मे) रात्री टोकाचं पाऊल उचललं आणि त्याची दोन्ही मुलं पोरकी झाली. पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिचा गळा दाबून खून करून स्वतः गळफास केल्याची घटना पुण्यातील वडगावशेरी भागात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

उषा योगेश गायकवाड (वय २८) असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून, योगेश गायकवाड असं पत्नीचा खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावशेरी भागातील पिराजी नगरमध्ये उषा आणि योगेश गायकवाड हे आपल्या दोन मुलांसोबत राहत होते. योगेश मिळेल ते काम करायचा, पण सध्या काहीच काम नसल्याने तो घरीच असायचा. तर त्याची पत्नी उषा ही घरकाम करून घराचा उदरनिर्वाह चालवायची.

पत्नी उषाच्या चारित्र्यावर योगेश सतत संशय घ्यायला लागला. यावरून दोघांमध्ये भांडणही होतं. नंतर भांडण दररोज व्हायला लागली. याच रागातून सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुले झोपी गेल्यावर योगेशने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले सकाळी उठल्यावर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती चंदननगर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *