प्रख्यात उद्योगपती भास्कर साण्डू यांचे निधन

आयुर्वेदिक क्षेत्रात १२० वर्षांहून अधिक काळाची विश्वसनीय परंपरा असलेली औषध कंपनी ‘साण्डू फार्मास्युटिकल्स’चे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योगपती भास्कर गोविंद साण्डू यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. तब्बल साठ वर्षे आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात आणि साण्डू फार्मास्युटिकल्समध्ये कार्यरत असलेले भास्करराव हे गेली २० वर्षे कंपनीचे अध्यक्ष होते.

आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केलेल्या साण्डू यांच्या कारकीर्दीतच ‘साण्डू फार्मास्युटिकल्स’चा पसारा कैकपटीने वाढला. कर्मचारीवर्ग चौपट वाढला. तर कंपनीचा विस्तार अनेक देशांमध्ये झाला. उत्पादन १००० टक्क्यांनी वाढले. चेंबूरचे सुसज्ज कार्यालय, नेरूळ येथील अत्याधुनिक कारखाना, गोव्याचा महाकाय कारखाना हा विस्तार त्यांच्या काळातच साध्य झाल्या. त्यांच्या कारकीर्दीतच साण्डू फार्माचे इथिकल डिव्हिजन सुरू करत त्यांनी अनेक आयुर्वेदिकेतर डॉक्टरांना आयुर्वेदिक औषधांची माहिती देऊन आयुर्वेदिकाभिमुख बनविले. पोद्दार महाविद्यालयामधून वाणिज्य पदवी घेतलेले भास्करराव ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. वडील गोविंदराव साण्डू यांच्या आदेशानुसार १ जानेवारी १९६०मध्ये वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी साण्डू फार्मास्युटिकल्सच्या विपणन विभागामधून कामाला सुरुवात केली. आपल्या कामात दाखवलेल्या कौशल्यामुळे कंपनीची प्रगती होत गेली आणि लवकरच ते कंपनीचे संचालक झाले. त्यांच्या काळातच गोव्यात कारखाना उभारणीचे काम सुरू झाले आणि त्यानंतर मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर कंपनीची नोंदणी झाली. हे टप्पे कंपनीच्या प्रगतीमध्ये अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात ‘मिस्टर पोद्दार’ ठरले होते. ते पॉवरलिफ्टर होते. स्वतः नेहमी सुदृढ राहत आणि इतरांनी तसेच असावे, असा त्यांचा आग्रह असे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *