मोहन अटाळकर यांना उत्कृष्ट कृषी पत्रकारिता पुरस्कार

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार १५ जणांना जाहीर झाला आहे. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन येत्या २१ मे रोजी  सन्मान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कृषी पत्रकारिता पुरस्कार अमरावती जिल्हा प्रतिनिधी मोहन अटाळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांमध्ये दादाराव घायर, ममता ठाकूर, नामदेव वैद्य, मनोज काळे, सुमित मातीकाळे, ज्ञानेश्वर डेहणकर, अमिताभ तरार, संजय गांजरे, सतीश औसीकर, नीलेश पेठे, सुधीर फु के  यांचा समावेश आहे. याशिवाय श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. अनिल बंड, रेशीम उद्योग अधिकारी महेंद्र ढवळे, कृषी विद्यार्थी निखिल यादव यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

कृषी आणि सिंचनविषयक सातत्याने लिखाण करून शेती प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल मोहन अटाळकर यांना गौरवण्यात येणार आहे. निवड समितीच्या अध्यक्ष पौर्णिमा सवाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कृषिरत्न निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कार्याची दखल घेतली पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताचे माजी पंतप्रधान दिवं. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने २१ मे रोजी शेतकरी, शेतमजूर, शेतीशी निगडित प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांचा गौरव करण्याची संकल्पना समोर आली.

नेहमीच विपरीत परिस्थिती, कमी भांडवल, कमी खर्चाची शेती करून शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या देशाच्या उत्पादनात वाढ करीत आहेत. अशा उपक्रमातून शेतीसंदर्भात विविध विषयावर चर्चा होते, आश्वासक तोडगा निघतो. शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक जण समोर येतात. हीच या पुरस्काराची यशस्वीता ठरते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान येत्या २१ मे रोजी करण्याचे ठरवले असून दिवं. खासदार राजीव सातव यांना यंदाचा सोहळा समर्पित करण्यात आल्याची माहिती प्रकाश साबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *