कार विहिरीत कोसळून चौघांचा बुडून मृत्यू

साक्री तालुक्यातून सटाणा येथे परतत असताना, मालपूर कासारानजीक मारुती अल्टो कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील आई, मुलगा, मुलगी तसेच मुलीची मैत्रीण अशा चार जणांचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने वडील सुखरुप बचावले. कार मागे घेत असताना ही दुर्घटना घडली. चौघांच्या मृत्यूनंतर आंबेडकर नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सटाणा शहरातील वेल्डिंग वर्कशॉपचे काम करणारे शंकर बोरसे हे कुटुंबीयांसह दयाने (ता. साक्री) येथे विवाह समारंभासाठी गेले होते. तेथून ते स्वतःच्या कारमधून पत्नी गौरी, मुलगी श्रद्धा (वय १२), मुलगा तन्मय (वय ९) व भूमिका योगेश पानपाटील (वय ११) यांच्यासह सटाण्याकडे परतत होते. दिघावे गावापासून चार किमी अंतरावर मालपूर कासारानजीक रस्ता चुकल्याने मूळ रस्त्याला लागण्यासाठी कार मागे घेत असताना जवळील पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत मारुती कार कोसळली. या दुर्घटनेत गौरी, तन्मय, श्रद्धा व भूमिका या चौघांचा बुडून मृत्यू झाला, तर शंकर बोरसे सुरक्षित बाहेर आले. अपघाताचे वृत्त परिसरात समजताच शेतकरी व ग्रामस्थांनी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले. सायंकाळी उशिरापर्यंत चौघांचे मृतदेह शोधण्यात यश मिळाले. रात्री उशिरापर्यंत साक्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासह पुढील कार्यवाही सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *