करोना संसर्गाची लागण झाल्याने वैद्यकीय उपचारासाठी बीकेसी कोविड केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेल्या संगीता तनाळकर यांचा मृतदेह जिवंत असलेल्या मनीषा म्हात्रे (नाव बदलले आहे) यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे अतिशय अस्वस्थ झालेल्या तनाळकर कुटुंबीयांनी आमच्यासोबत जो प्रकार झाला, तो इतर कुणासोबतही होऊ नये, अशी खंत व्यक्त केली. येथील प्रत्येक वैद्यकीय कर्मचारी जीव तोडून काम करतो. मात्र, प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे आईला निरोपही देता आला नाही, हे शल्य आयुष्यभर जिवाला डाचत राहील, हे सांगताना तनाळकर यांचा मुलगा अभय यांच्या आवाजातील वेदना लपत नव्हती.
संगीता तनाळकर यांचा मृत्यू झाला, तेव्हा मनीषा यांच्या कुटुंबीयांना त्या मृत झाल्याचे कळवण्यात आले. त्यांचे कुटुंबीय विलगीकरणात असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकाने मृतदेह स्वीकारून त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले. तनाळकर मात्र त्यांच्या आईचा शोध घेत राहिले. अखेरचा पर्याय म्हणून पोलिसांच्या मदतीने स्थानिक आमदार संजय पोतनीस यांच्या प्रय़त्नांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांच्या आईला १६ तारखेला १२ वाजून १८ मिनिटांनी फेज टूमध्ये नेण्यात आल्याचे दिसून आले. ऑक्सिजनची गरज असल्यामुळे संगीता यांना तेथे नेण्यात आले होते. तिथेही त्यांची नोंद झाली नाही. यासंदर्भात सतत तगादा लावल्यानंतर केंद्राने वॉर्डमध्ये जाऊन आईला शोधण्याची संमती अभय यांच्या बहिणीला दिली. पोलिसांच्या मदतीने हा शोध घेतल्यानंतर १७ तारखेला संगीता यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा मृतदेह मनीषा यांच्या कुटुंबाला देण्यात आल्याचे उघडकीस आले. पॉझिटिव्ह झाल्यामुळे सध्या विलगीकरणात असलेल्या अभय यांनी रुग्णसंख्या सातत्याने वाढती असून, ताण वाढता असला, तरीही कुटुंबीयांची मानसिक अवस्था समजून घ्या, अशी विनंती केली आहे.
