बुधवारी नाशिकमधील रुग्णालयामध्ये ऑक्सिजन गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आज विरारमधील कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आपत्कालीन मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळेच मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून दोन लाख तर राज्याकडून पाच लाख असा सात लाखांचा मदतनिधी मिळणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील घोषणा करण्यात आलीय. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून विरार येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत देण्यास मंजूरी दिलीय. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय,” असं ट्विट पीएमओच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

