महाराष्ट्रात करोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. राज्यात रेमडेसिवीरचा तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्राकडे मदतही मागितली आहे. दरम्यान राज्याच्या मदतीसाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे.
जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. कंपनीच्या नियमांमुळे त्यांनी आपलं नाव जाहीर केलेलं नाही.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ट्विट करत या माहितीला दुजोरा दिला आहे. “रिलायन्सच्या जामनगर प्लँटमधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल,” अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.