औरंगाबादमध्ये उस्मानपुरा भागातील पीरबाजार परिसरात केशकर्तनालय चालकाचा मृत्यू झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्धवट शटर लावून आतमध्ये कटिंग, दाढी सुरू असल्याच्या संशयावरून केशकर्तनालय चालक फेरोजखानला पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत फेरोजखान याचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. यामुळे परिसरात मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्यात अक्षरशः अराजक माजलं असल्याचं म्हटलं आहे. “मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे. केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी औरंगाबादला प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरशः अराजक माजलं आहे,” असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.