ठाणे जिल्ह्यात करोनामृत्यू वाढले

ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला असून गेल्या १२ दिवसांत २४१ रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. दररोज मृतांचा समोर येणारा आकडा चिंताजनक असून संपूर्ण मार्चमध्ये दगावलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत चालू महिन्यातील आतापर्यंतची मृतांची संख्या २१ने जास्त आहे.

मार्च महिना सुरू होताच जिल्ह्यात दररोज नोंद होणाऱ्या मृतांची संख्या एक अंकी होती. मध्येच तीन दिवस हा आकडा दोन अंकी झाला होता. मात्र, त्यानंतर २८ मार्चपासून दररोजचा मृतांची संख्या दोन अंकी झाला. एप्रिल महिना उजाडून १२ दिवस झाले तरी दोन अंकानेच मृतांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. परंतु मार्चमध्ये करोनामुळे २२० रुग्ण दगावले असून चालू महिन्यामध्ये करोनाबळींचा आकडाही जास्त असल्याचे चित्र आहे. अनुक्रमे १२ दिवसांत १८, १५, १९, १७, २०, १८, २१, १८, २६, २४, १९ आणि २६ अशा प्रकारे २४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसामध्ये करोनाबळींच्या संख्येत वाढ झाल्यानंतर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या साडेसहा हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे करोनामृत्यू रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. जिल्ह्यात ठाणे शहरात आतापर्यंत सर्वाधिक १ हजार ५११ रुग्ण दगावले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार २९६, नवी मुंबई १ हजार २२६, मिरा-भाईंदर ८६६, उल्हासनगर ३८८, भिवंडी ३७४, अंबरनाथ ३२५, बदलापूर १२६, ठाणे ग्रामीणमध्ये ६२१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील मृत्युदर पावणेदोन टक्क्यांच्या आसपास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *