वाघांसाठी कूलर अन् प्राण्यांसाठी फॉगर

उन्हाळ्याच्या झळांचा त्रास प्राण्यांना होऊ नये यासाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये नेहमीप्रमाणे कूलर, फॉगर, स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आली आहे. वाघांच्या पिंजऱ्याबाहेर कूलर, तर हरणांसाठी फॉगर बसवण्यात आले आहेत. याशिवाय अस्वलांसाठी आईस फ्रूट केक तयार करण्यात येत आहेत.

माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही उन्हाचा त्रास होतो. जंगलांमध्ये पाण्याच्या शोधात फिरताना उष्माघातामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यूही होतो. प्राणिसंग्रहलायतील वन्यप्राण्यांची उन्हाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते. तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे गेल्यानंतर किंवा रात्रीचा गारवा कमी झाल्यावर वन्यप्राणी उकाड्याने अस्वस्थ होतात. काही प्राणी तर तासन्‌‌तास पाणवठ्यामध्ये बसून राहतात. त्यामुळे दर वर्षी तापमान वाढल्यावर प्राणिसंग्रहालयात प्राण्यांना गारवा मिळण्यासाठी व्यवस्था केली जाते. वाघ, बिबट्या, हरणांपासून ते अस्वल, साप, साळिंदरापर्यंत प्रत्येक प्राण्यासाठी वेगवेगळ्या उपयायोजना केल्या जातात.

‘संग्रहालयातील वाघांपैकी रोज एकेकाला खंदकात सोडले जाते. पिंजऱ्यातील वाघांसमोर गारव्यासाठी कुलर लावतो. खंदकात सोडलेले वाघ दुपारी पाणवठ्यात बसून आराम करतात. या वर्षी कूलरसोबतच बिबट्या, साळिंदर, सांबर, नीलगाय, हरणांच्या खंदकांमध्ये स्प्रिंकलर आणि फ्रॉगर्स बसविण्यात आले आहेत. गवतावर सातत्याने पाण्याचा शिडकाव होत असल्याने प्राण्यांना उन्हाचा त्रास होत नाही. पक्ष्यांसाठी त्यांच्या पिंजऱ्यात फॉगर बसवले आहेत,’ अशी माहिती राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी दिली.

‘अस्वलांसाठी आम्ही कधी कधी आईस फ्रूट केक आणतो. बर्फाच्या आत फळे ठेवून बनवलेला आईस केक अस्वलांसाठी मेजवानी ठरते. बर्फ तयार होत असतानाच, अस्वलाला आवडणारी फळे त्यात ठेवली जातात. अस्वल खुबीने बर्फातून फळे शोधून खाते. यामुळे त्याला गारवाही मिळतो,’ असे जाधव यांनी सांगितले.

वन्यप्राण्यांना नवीन हंगाम स्वीकारताना त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये प्राण्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. आम्ही प्राण्यांच्या आहारामध्ये बदल करत नाही. मात्र, नियमित तपासणीदरम्यान डॉक्टरांनी सल्ला दिल्यास प्राण्यांच्या आहारात बदल करतो. सध्या संग्रहालय बंद आहे, अन्यथा एरवी उन्हाळ्यात पर्यटकांसाठीही आम्ही ठिकठिकाणी स्प्रिंकलर बसवतो.

– राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

प्राणिसंग्रहालय बंदच

शहरातील उद्याने खुली करण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली असली, तरी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महाराष्ट्रातील प्राणिसंग्रहालये सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. गेल्या वर्षी मार्च अखेरीस बंद झालेल्या संग्रहालयाचे कुलूप एक वर्ष झाले तरी उघडले नाही. एप्रिल महिन्यापासून संग्रहालय सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार होता. मात्र, करोनाचे रुग्ण वाढल्याने निर्णय मागे घेण्यात आला. उन्हाळा आणि दिवाळी हे दोन्ही सुट्ट्यांचे हंगाम रिकामे गेले असून, उत्पन्नात चार कोटी रुपयांनी घट झाल्याची माहिती प्राणिसंग्रहालयातर्फे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *