हापूस आंब्याची वातानुकूलित स्वारी

वाढत्या उष्णतेचा फटका मुंबईकरांसह आता फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यालादेखील बसला आहे. वाढत्या उष्म्यामुळे हापूसवर होणारा परिणाम लक्षात घेता वातानकूलित वाहनातून कोकणातील आंब्यांची मुंबईकरांना घरपोच सेवा मिळणार आहे. कोकणातील आंबे एका क्लिकवर मिळवता यावेत, यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोकणातील १०० शेतकऱ्यांनी एकत्र येत देशातील पहिल्याच ‘मायको’ या मँगोटेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतातील हापूस थेट जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नैसर्गिकरित्या पिकलेल्या उत्तम दर्जाचा हापूस आंबा घरपोच मिळावा यासाठी ‘मायको’ने वातानुकूलित गाड्यांची (रिफर व्हॅन्स) सोय केली आहे. आंबा खराब होऊ नये आणि त्याचा दर्जा कायम राहावा , यासाठी विशिष्ट तापमान या गाडीत असेल. या गाड्यांचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी नुकतेच उद्घाटन केले. सध्या ही सेवा मुंबईत सुरू असून, येत्या काही दिवसांत ठाणे, पालघर परिसरात ती उपलब्ध होणार आहे.

हापूसची साल पातळ असते. परिणामी तीव्र उन्हामुळे आंबे काळवंडले जातात. खराब झालेला आंबा फेकून द्यावा लागतो व यामुळे शेतकऱ्यांचेही प्रचंड आर्थिक नुकसान होते. शेतकरी, आंबा बागायतदार यांचे नुकसान होऊ नये आणि ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा आंबा मिळावा यासाठी वातानुकूलित गाड्यांची सोय करण्यात आली असल्याचे ‘ग्लोबल कोकण’चे संस्थापक संजय यादव यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात मुंबईत तीन गाड्या दाखल झाल्या असून ठाणे आणि नवी मुंबईतही या गाड्यांची सेवा येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. ‘मायको’च्या संकेतस्थळावरून ग्राहकांनी आंबे ऑनलाइन ऑर्डर केल्यावर त्यांना या गाड्यांमधून आंब्यांची घरपोच सेवा दिली जाईल, असे ‘मायको’च्या सह संस्थापक सुप्रिया मराठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *